रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाला सायबर गुन्ह्यांमधील पैसे तक्रारदारांच्या बँक खात्यामध्ये परत मिळवून देण्यात यश
तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्हयांच्या प्रमाणात वाढ होत आहे. सायबर गुन्हेगारांकडून विविध पद्धतींचा वापर करून सर्वसामान्य नागरीकांची आर्थिक फसवणूक केली जाते. पर्यायाने सर्वसामान्य नागरीकांनी घरखरेदी, जमिन खरेदी, मुलांची लग्ने इत्यादी गोष्टींकरीता साठवून ठेवलेल्या पैशांची सायबर गुन्हेगार सर्वसामान्य नागरीकांच्या सायबर अज्ञानाचा फायदा घेवून आर्थिक फसवणूक करतात. या सर्व गोष्टींचा सखोल आढावा घेवून वाढत्या सायबर गुन्हयांना प्रतिबंध व्हावा या उद्देशाने रत्नागिरी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, ( भा.पो.से. ) यांच्या संकल्पनेतून Cyber ehSAS ( e - Swachchta Abhiyan for Secure Society ) या नावाने सायबर जनजागृती अभियान रत्नागिरी जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राबविण्यास सुरुवात करण्यात आली. या अभियानाअंतर्गत नागरीकांनी बँक एटीएम कार्डची माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, मोबाईलवर येणारे ओटीपी इतरांना किंवा अनोळखी व्यक्तींना शेअर करू नये, फसव्या योजनांच्या अमिषांना बळी पडू नये, आर्थिक व्यवहार होणा-या वेबसाईटवर काम करताना दक्षता घ्यावी, अशा प्रकारचे संदेश देणारे निरनिराळे बॅनर्स, भित्तीपत्रे, हैंडबिल्स, पॅपलेट्स, स्लाईड शोच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते. तसेच या अभियानाअंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी दाखल सायबर गुन्हयांचा सतत पाठपुरावा करून गुन्हे उघडकीस आणण्याकरीता व सर्वसामान्य जनतेचे सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केलेले पैसे परत मिळविण्याकरीता कसोशीने प्रयत्न करण्याबाबत सायबर पोलीस ठाणे तसेच जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांना आदेशित केले. त्यानुसार रत्नागिरी जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांचे हद्दीमध्ये जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या मुदतीमध्ये दाखल गुन्हयांपैकी एकूण ०७ गुन्हयांमध्ये रक्कम रूपये ५,३६,३८७ / - तसेच एकूण ०६ अर्जामध्ये ५,४७,०००/- अशी एकूण रक्कम रूपये १०,८३,३८७ / - एवढे पैसे तक्रारदारांच्या बँक खात्यामध्ये परत मिळविण्यात रत्नागिरी पोलीसांना यश आलेले आहे. तसेच रत्नागिरी जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांचे हद्दीमधून गहाळ झालेल्या मोबाईल बाबतची माहीती एकत्रीत करून पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी यांच्याकडून त्या मोबाईलचा शोध घेवून माहे ऑगस्ट २०२१ ते जानेवारी २०२२ या मुदतीत गहाळ झालेल्या मोबाईलपैकी एकूण २० मोबाईल परत मिळविण्यात आले. त्यामध्ये चिपळूण उपविभागातून १३, लांजा उपविभागातून ०२, राजापूर उपविभागातून ०३, खेड उपविभागातून ०२ मोबाईल परत मिळविण्यात आले. त्यापैकी १५ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना दिनांक २६/०१/२०२२ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभामध्ये रत्नागिरी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहीत कुमार गर्ग, यांच्या हस्ते परत देण्यात आले असून उर्वरीत ०५ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांशी संपर्क साधून परत देणार आहेत. तरी आर्थिक फसवणूकीच्या सायबर गुन्हयांमध्ये पोलीस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहीती दिल्यास फसवणूक झालेली रक्कम परत मिळण्याची शक्यता असल्याने अशा प्रकारच्या सायबर गुन्हयांबाबत तसेच गहाळ झालेल्या मोबाईल बाबत तात्काळ नजिकच्या पोलीस ठाण्यात जावून तक्रार नोंदविण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहीत कुमार गर्ग (भा.पो.से.) यांनी जनतेला आवाहन केले आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा