वेळ संध्याकाळची... कणकवली वरून सावंतवाडी ला जाणारी एस.टी पकडली. एस.टी. जलद असल्याने चालक नियमीत वेगाने बस पळवत होता, नेमके काही थांबे करत बस सिंधुदुर्गनगरी ( ओरोस) ह्या नुतन बसस्थानकात पोहचली आणि प्रवाश्यांची चढउतार चालू झाली त्याच दरम्यान सडपातळ बांधा असणारी गरोदर महीला बस मध्ये चढली आणि पुढच्या काही सीट्स फुल असल्याने सदरील महिला बस मध्ये मागच्या बाजूला आमच्या शेजारील सीटवर येउन स्थानापन्न झाली....पण नविन रस्त्याच चालू असलेल काम बस जलद असल्याने वेगामुळे बसणारे धक्के आणि ते वाचवण्यासाठी तिची सुरू असलेली धडपड आणि जिवाची घालमेल स्पष्ट दिसत होती. त्याच दरम्यान तिकीट काढत असलेल्या कंडक्टर च लक्ष सदरील महिलेवर पडले आणि क्षणाचाही विलंब न लावता महीलेची विचारपूस करण्यासाठी कंडक्टर तिथे हजर झाला. मॅडम आपण कूठे जाणार आहात? त्रास होत असेल तर पूढे जाउन बसा ...! अशी काळजीरुपी प्रश्नाने महीला थोडी हसतच बोलली ....नाही पूढे जागा नसल्यामूळे मागे येउन बसाव लागल मला. कंडक्टर ने क्षणाचाही विलंब न लावता गाडी चालवत असलेल्या चालकाला काही तरी सांगून आला आणि त्या महीलेला पूढची सीट रिकामी होई पर्यंत आपल्या सीटवर बसण्याची विनंती केली.... कंडक्टर ड्राईवर शी करून आलेल्या बातचीत नंतर बसचा वेळ थोडा मंदावला होता आणि प्रत्येक खड्ड्यातून बस हळूवार पणे मार्गस्थ होत होती. हे सर्व पाहून एस.टी. च्या चालक आणि वाहकांबद्दल असणारी आपूलकी अाजूनच वाढली.
चालक आणि वाहक खर तर आपल्या एस. टी. चे दोन डोळे आणि ते नसतील तर पूढे काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी कदाचित संपाच्या वेळी बर्याच जणांनी ती अनूभवलेली पण असेल. एकदा ड्युटी चालू झाली की प्रवाशांची अविरत सेवा यांच्याकडून चालू असते त्यात कंडक्टर ला प्रवासावेळी जेवढे प्रवासी तेवढ्या स्वभावांना तोंड द्याव लागत. तर आपले चालक पण बस मध्ये प्रवाशी नाही तर आपल्या घरातीलच माणसं आहेत याच अविर्भावात सुरक्षितत गाडी चालवत असतो. प्रवासात बस मध्ये बसलेले प्रवाशी जेव्हा बिनधास्त झोपलेले दिसतात तेव्हा एस.टी. च्या चालकावर प्रवाशांचा किती विश्वास आहे हे न सांगता समजत.
रात्रवस्तीच्या ठिकाणी चालक वाहक यांची रहायची , झोपायची , पाण्याची ,संडास बाथरूम ची व्यवस्थित नसलेली सोय, त्यात घराकडून आणलेला थंडगार झालेला डबा घरच्यांपासून लांब राहून खाताना त्यांच्या मनाची होत आलेली घालमेल आपण केव्हा जाणून घेतली का? रात्रीच्या मच्छरींच्या सहवासात बस च्या सीटवर झोपून अर्धवट झोपेने झालेली सकाळ, सकाळी उठल्यावर साधा चहाचा पण घोट न घेता वस्तीची एस.टी. बस सकाळीच शाळा कॉलेज च्या मुलांना तसेच कामावर , व्यवसायासाठी जाणार्या लोकांना नियोजित स्थळी सोडण्यासाठी वेळेवर हजर करतातच. मनात फक्त एकच विचार प्रवाशांना सुरक्षिततेसह योग्य वेळेवर त्यांना योग्यस्थळी सोडण.
असंख्य जणांचे शिक्षण, व्यवसाय नोकरी धंदे आणि बर्याच चांगल्या गोष्टी आपल्या ह्या लालपरीने वृद्धिंगत केल्या आहेत. अनेक जणांचे संसार आज आपल्या या एस्टी ने पूर्णत्वास नेले आहेत. महाराष्ट्राच्या विकासात आपल्या लालपरीच योगदान न विसरता येणार आणि कायम उच्चस्थानावर राहील यात कसलीच शंका नाही आणि याच महत्वाच श्रेय निच्छितच आपल्या लालपरींच्या प्रामाणिक चालक आणि वाहक यांनाच जाईल. आंदोलनाच्या वेळी, रस्त्यात प्रवास करताना, बसमधून प्रवास करताना काही वेळा येणार्या वाईट अनुभवामुळे आपण मात्र घाणेरडया शिव्यांनी गलिच्छ शब्दांनी त्यांचा उद्धार करतो. हे कितपत योग्य आहे? याचा निच्छितच आपण सर्वानी एकदा त्यांच्या जागी राहून किंवा त्यांच्या कुटुंबाच्या जागी राहून विचार नक्कीच करावा........
लालपरीच्या आपल्या एस.टीच्या सर्व चालक वाहकांसाठी हा लेख समर्पित....
photo credit:- Vikash Sable (सदरील फोटो हा ह्या लेखात चालक वाहक केंद्रबिंदू असल्याने वापरलेला आहे)
नितिन गोलतकर, कुडाळ, सिंधुदुर्ग
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा